आप्पा म्ह्टलं कि मन मागे मागे जाउ लागतं....किती काळ लोटला अप्पा गेले त्याला बारा वर्ष उलटली...पण अजूनही आप्पा हा शब्द मनात आला कि..जाड मिश्या..तुळतुळीत टक्कल..धोतर...बंडी...काळी टोपी..खणखणीत आवाज...जरब ...तरीही हळवं मन...राहातच चित्र समोर
आप्पा एक अजब व्यक्तिमत्व होतं...सगळ्या कुटुंबाला एक प्रकारचा धाक होता. आम्हा नातवंडांसोबत मात्र लहान व्हायचे. मोठ्यांना कायम हेवा वाटायचा त्यांच्या या लवचिकतेचा. माझ्या आप्पांच्या आठवणी अनेक स्तरांवर घेऊन जातात...त्यांचे त्या वयात सांगितलेली अनेक वाक्ये आयुष्याच्या अनेक टप्यांवर साथ देतिल याची जाणीव तेव्हा नव्ह्ती.
आप्पा म्हटलं तर मी पहातो तेव्हा पासून काहि करायचे नाहीत अन म्हटलं तर बरंच काही करायचे...पहाटे पाचला उठून मैलभर अन्तरावर कपर्दिकेश्वराला नदीवर अंघोळीला जाणे..सोबत त्यांचे मित्र आण्णा यांना वाटेत आवाज द्यायचे...हा नियम उन्हाळा,हिवाळा,पावसाळा कधीच चुकला नाही. अगदी दिवाळीच्या पहाटे सुध्धा पहिली आंघोळ नदिवर.. नंतर परत आजी, आत्या, आई यांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा घरी आंघोळ अम्ही खूप हसायचो यावर.
कधितरी लहर आली कि विचारायचे मला चल येतोस का नदीवर मी वाटच पहात असायचो...थंड पाण्यात जाताना एक डुबकी पटकन मारली कि थंडी वाजत नाहि हे पहील्यांदा अप्पांनी उचलून पाण्यात फेकलं तेव्हा शिकलो. आप्पा आणि आण्णा हि जोडी जरा पोहून झालं की पाण्यावर हात पाय लांबवून तरंगत राहात अम्हा मुलांना खूप आश्चर्य वाटे. हळू ह्ळू मीही पोहायला, तरंगायला शिकलो. आणि या असे होण्य़ाला Buoyancy म्हणतात हे मात्र नंतर कधीतरी शाळेत कळाले. चपटे दगड पाण्यावर टाकताना तीन चार टप्पे खात जाणही तिथेच शिकलो...
आपले कपडे नदीवर पिळून आणणे हि आप्पांची सवयही नजेरेतून सुटली नव्ह्ती. एकदा मात्र गंम्मत झाली धोतराचा पिळा उघडून आजी वाळत घालू लागली न एक छोटी मासोळी टुनकन उडी मारून फरशीवर पडली. अजूनही आठवतोय आजीचा तो चेहेरा आणि आम्ही हसलो म्हणून ओरडून लगेच आमच्याच सोबत खो खो हसणारे आप्पा.
आप्पा पुजेला बसले की मुलांना वाटे आता त्यांचे लक्ष नाही आप्ण जरा मस्ती करूयात. त्याचे कान मात्र कानोसा घेत रहात. कोणी वात्रटपणा केला की त्यांचा स्त्रोत्रपठणाचा आवाज आणि गती वाढायची. हेच आप्पा नंतर बाजारात गेले की भरपूर खाऊ घेऊन येत. धोतराच्या सोग्यात एखाद दुसरी भाजीची जुडी. फळे असे काहिना काही आणत असत.
आप्पांसोबत बाजारात जाणे हा एक अनुभव असे. त्यांचं भाव विचारणं.....भाव कमी करून मागणं...आणि हवा तो भाव मिळाल्यावर जणू आपण भाजी घेतोय म्हणजे त्याचावर उपकार करतोय अशा आविर्भावात वावरणं...सगळच अजब वाटायचं मला.
आप्पांच्या आवजात एक जरब होती...तरी आतला हळवा माणूस नेहेमी दिसायचा. आप्पांचं व्यवहार्य वागण...त्यांच भविष्याच्या कडे पाहून आधी केलेलं नियोजन....त्यांचं असणारं चोफेर लक्ष...त्यांचं खुलेपणाने नव्या गोष्टी समजून पडताळून पाहून त्यातील योग्य स्वाकारण्याची तयारी....अशा अनेक आठवणि मनात दाटतात.
आयुष्याची जवळ जवळ चाळीस वर्ष आप्पा दिवसातून एकदाच जेवत असत...रात्री एखादं फळ दूध असा आहार....वयाच्या ८० वर्षापर्यंन्त आप्पा खम्बीर आणि शारीरीक दुरुस्त होते.
आप्पा म्हणजे ...
एक अधारवड...भक्कम सावली देणारा
एक नाजूक पारंबी ....झुलावेसे वाटणारी
छोटी लाल्चुटूक फळॆ सगळ्या पाखरांचा मेवा...पुरून खूप सारा ऊरणारा
अनेक फान्द्यांच्या अन ढोल्यांच्या जागा ..ऊबदार ..आश्वस्त...
आप्पांच्या आठवणींमध्ये रममाण झालं की सगळं सलग आठवत जातं. त्यांचं मला शाळेत सोडायला येणं, श्रावणी सोमवारी त्यांचा हात धरून जत्रेला जाणे, खाऊ खेळणी घेणे, कुस्त्यांचा हगामा पहाणे अशा अनेक गोष्टी नजरेसमोरून सरकू लागतात. आप्पा म्हटलं की गाय छापची पुडी आटवते. त्यांची पुडी लपवून ठेवायची आणि त्याबदल्यात काहितरी मागायचे, त्यांनी ते कबूल करायचे असा प्रकार माझा भाऊ करीत असे. खरेतर ते चार आण्याची नवी पुडी सहज आणू शकले असते पण नातवाचा हट्ट पुरविणे त्यांना छान वाटे.
आम्ही थोडे मोठे झालो आप्पाही बदलले....गोष्टी सांगेन युक्तीच्या चार असे अनेक गोष्टी सांगू लागले. शिक्षणातील अनेक गोष्टी आप्पांकडून बालपणीच शिकल्यासारख्या वाटत फक्त नव्याने ओळख होई इतकच.
आता पस्तीशीत जेव्हा संगीताचं शिक्षण घेतोय तेव्हाही आप्पाच आठवतात....त्यांचा दिवसभर सुरू असणारा पुणे आणि मुंबई ब चा रेडीओ आणि त्यावरील दिवसाला चार मैफ़िली याच परत भेटतात आताही संगित शिकताना....नकळत घडवलेले संस्कार अप्पांचे.
त्यांच्या आठवणी असंख्य दाटतात मनात....आहेत ते आमच्यात अजूनही...कारण त्यांचाच वसा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत......वारसा हक्काने मिळते ती ईष्टेट...आणि संस्कारांने मिळतो तो वसा...आमच्या आप्पांसारखा...
No comments:
Post a Comment